आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Tuesday 11 December 2018

गिरनार पर्वतावर बाबांची - गुरूंशी भेट

गिरनार पर्वतावर बाबांची - गुरूंशी भेट



गिरनार पर्वतावर चढायच्या १०,००० पायऱ्यांचा बिकट मार्ग
सादरकर्ता -  शशिकांत ओक, नविन तम - दि. 24 फेब्रुवारी 2012
‘मला आदेश आलाय 'भेटायला गिरनार पर्वतावर ये! मी चाललो केव्हा परतेन माहित नाही.' सगळे भक्तगण आणि घरचे लोक हादरले. मार्च 2011 ची ती सुरूवात असावी. झाले, बाबा जाणार गिरनारला म्हणून चर्चा सुरू झाली आणि बाबांनी आपले प्रयाण अहमदाबाद येथे केले. पुढे सात दिवसांनी बाबा परत आपले गुरूवारच्या पुजेला हजर! सगळ्यांना हायसे वाटले आणि शिष्यगणांना गुरूंची भेट कशी झाली याबद्दल उत्सुकता लागली.

सौराष्ट्र भागातील जुनागढ यापूर्वीचे संस्थान राजधानीचे स्थळ. स्थळापासून काही किलोमीटर अंतरावरील रिझव्ह फॉरेस्ट मधे सिंहाची पैदास व राखण केली जाते. याच गीरजवळ गिरनार पर्वतावर अनेक नरशार्दुल गेल्या हजारो वर्षापासून वास्तव्य करून आहेत. दत्तात्रय, गोरक्षनाथ अशा नवनाथांनी व काही अन्य महाभागांनी कठोर तपश्चर्या करून तेथे वास्तव्य केल्याच्या खुणा गुहा आणि गिरीकंदरातून मिळतात.


साधारण तीन हजार पायऱ्यांपाशी जैन तिर्थंकारांचे वास्तव्यही या पर्वतावर असल्याने गिरनार पर्वताची यात्रा भारतीयांना शेकडो वर्षापासून आकर्षित करते. बाबा म्हणजे आमचे चितळे बाबा, त्या भेटीचे वर्णन करताना म्हणतात, ‘जवळजवळ दहा हजार पायऱ्याचा तो मार्ग माझ्यासारख्या सत्तरी उलटलेल्या व्यक्तीला पाहून भयचकित व्हायला होते. गुरूंचे निमंत्रण, निश्चय व धीर करून मी निशंकपणे पायऱ्या चढायला लागलो.सकाळी सात-सव्वा सातची वेळ असेल. शंभर सव्वाशे पायऱ्या चढल्यावर आता पुढे एक पाऊल टाकणे शक्य नाही असे वाटून मी प्रार्थना केली, 'मला माफ करा, महाराजा! आपल्या दर्शनाला मी येऊ शकत नाही. इथुनच मला परतण्याची परवानगी द्या' असे मनोमन म्हणत लागलेली धाप शांत होते न होते तोवर असा चमत्कार झाला की परत फिरायचे सोडा नंतर फारसे कुठेच न थांबता एकदम साधारण आठ हजार पायऱ्यांपाशी गोरक्षनाथांची गुहा आली. तेथे थांबणे झाले!
चढणारे आणि उतरणारे यांची गर्दी तुरळक होती. त्या गुहेपाशी आल्यावर थोडासा विश्राम घेऊन गुहेचे दर्शन घेण्यास मी पायऱ्यांवरून तिकडच्या वाटेला लागलो. गुंफा म्हणजे काय? साधारण एक छोटीशी खोली असेल इतपत दगडाची खोबण! वज्रासनात बसण्याएवढी जागा! अंधार आणि शांतता!
प्रत्यक्ष गुहेपाशी एक वृध्द किलकिले डोळे करून वाटेत बसलेले. त्यांनी बाबांना भुवया उंच करून विचारले, 'क्युं आए हो?' ते गोसावीवजा व्यक्तिमत्वाचे वृध्द पाहून बाबांनी म्हटले, ‘गुरू के दर्शन के लिए आया हूँ।‘ असे म्हणून बाबांनी ‘अलख निरंजन’ अशी जोरदार हाक दिली. त्यावर त्या गोसाव्यांनी 'अल्लख निरंजन' असे प्रत्युत्तर दिले आणि म्हटले, ‘यहाँ तो कोई गुरू या बाबा है नही। ये तो खाली गुफा है।‘ म्हणून गुहेकडे बोट केले. बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पटकन सुलगावलेल्या बिडीचा एक दीर्घ झुरका घेत म्हणाले, ‘देखते है।‘ त्यावर ते गोसावीबाबा म्हणाले, ‘पता नही कितने लोग आये और चले गए। तुम्हें क्या वहाँ देखने को मिलेगा? खाली पत्थर!’ पुन्हा बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून म्हटले, ‘जो होगा वो गुरू देख लेंगे. मेरे लिए तो गुरूका बुलावा आया हुआ है। इसलिए मैं आया हूँ। आगे का वो जाने।‘
आता त्या गोसावीबाबांनी मान डोलावली, ‘ठीक है, तो आप जाओ अंदर। तिथे एक स्वस्तिकासारखे चिन्ह ढकलून पाहा.’ असे म्हणून स्मित हास्य केले. बाबांनी पुन्हा एकदा ‘अलख निरंजन’ असे म्हटल्यावर गोसावी बाबांनी ‘अलख निरंजन’ असे त्याला उत्तर दिले आणि ते समोर ठेवलेल्या राखेच्या ढिगाकडे पाहत बसले.

बाबा त्या गुहेत म्हणजे एक दहा बाय बाराच्या एका खडकाच्या कोनाड्यात जवळ गेले. स्वस्तिका प्रमाणे खूण असावी त्या खडकावर दरवाजा समजून साशंकतेने जोर दिला. जणू काही एखादा पुराणा दरवाजा उघडण्यासाठीच तयार होता! एक वाट तयार झाली आणि बाबा आपसुकपणे आत गेले आणि मागनं पुन्हा तो दगड एकमेकात चिकटून गेला. एकदम अंधार झाला. मिट्ट अंधारात काही कळत नव्हते. छातीची धडधड वाढली होती. हे काय अघटित झालय या विचाराने मन धास्तावले होते. नक्की काय घडलय याचा थांग लागेना आणि बाबा व्याकूळ झाले. हळूहळू मनाची शांती झाल्यावर त्यांच्या डोळ्यांना प्रकाशाची जाणीव झाली
.... आणि त्या प्रकाशात एक धीरगंभीर, भव्य रूप समोर आढळले.
‘आओ, मैने बुलालावा भेजा था।‘ बाबांची विचारणा झाली आणि बाबांची क्षणभर बोबडीच वळली.
……
पुढे बाबा म्हणतात, ‘मी साधारण तेथे अर्धा तासापेक्षा कमी म्हणजे सत्तावीस मिनिटे होतो. त्यावेळात त्या प्रखर व्यक्तिमत्वाच्या आभा वलयात मला अनेक गोष्टींचे खुलासे केले. काही चुका, काही अक्षम्य चुका व वर्तमानस्थिती व पुढील कार्याची दिशा यांचा झाडा घेऊन त्यांनी माझ्यावर सतत लक्ष असल्याचे दर्शवून दिले.’
‘आता तरी यापुढे सावध रहा’ असा सल्ला देऊन म्हटले, ‘आतातरी तुझी साशंकता गेली की नाही?’ हे पाहण्यासाठी तुला इथे भेटण्याचा आदेश दिला. इथे आलास यातून तुझी परीक्षा झाली.’
........ बाबांनी हात जोडून त्यांच्याकडे पाहून मानेने हो म्हटले आणि त्या कमी होत जाणाऱ्या प्रकाशाकडे पाहून डोळ्यातील घळघळणारे अश्रू सावरले. ‘गुरू महाराजा, चुका पदरात घ्या. सांसारिक जगात वागताना आपसुक चुका होतात. नंतर जाणीव होते की तेही एक माझ्याकडून करून घेतले जाणारं नाटक आहे. याची जाणीव मला सतत आहे. आपल्या आर्शिवादाने.’ बाबांनी पुन्हाःपुन्हा हात जोडले आणि प्रार्थना केली माझ्याकडून गुरूप्रेरणेने सतत आदेश मिळत राहोत आणि आयुष्याच्या अंतापर्यंत ते जनकल्याणाकरिता सदा उपयोगी ठरोत. आजचा दृष्टांत माझ्या आयुष्याचा अविस्मरणीय भाग ठरो.’
….प्रार्थना संपत नव्हती. पाय भरून आले होते. घामाच्या धारा होत्या. अंधारात चाचपडत. जिथे तिथे जोर लावून ढकलण्याचा प्रयत्न केला. पुन्हा खडक सरकून दरवाजा झाला. त्यातून मी बाहेर आलो. दुपारचे बारा वाजून गेलेले. बाहेर लोकांची ये-जा. ते गोसावीबाबा धुनीपाशी बसलेले. सत्यातील जगाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर हळूहळू तरळू लागले. तेव्हा नुकताच झालेला तो अदभूत अनुभव सत्य होता याची पूर्णतः खात्री पटली.
‘क्यूं, क्या हुआ? असे म्हणून गोसावी बाबांनी मिचमिच्या डोळ्यांनी पाहिले. बाबांनी ‘अलख निरंजन’ म्हटले. त्यांनी दिलेली उदी कपाळाला लावली. अन त्यानंतर जे घडले ते अदभूत होते.' अलख निरंजन' पुकाराकरून गोसावी बाबाने माझ्याकडे पहात माझ्या हातात सात रुद्राक्ष आणि एक पांढऱ्या रंगाचा मोत्यासारखा खडा दिला! जणु ते सर्व माझ्यासाठी तयारच ठेवलेले होते! त्या वेळी क्षणभर वाटले, आत भेटलेले व्यक्तिमत्व तेच तर नव्हते? ‘अलख निरंजन’ चा पुकारा करत करत बाबा पुढे निघाले.
                              

                                 हेच ते सात रुद्राक्ष आणि मोत्यासारखा खडा.

बाबांचा हा अनुभव आम्हा शिष्यगणांना अदभूतकथन वाटते होते. नंतर वेळोवळी बाबांनी त्या घटनेचा उल्लेख केला. म्हणाले, ‘पुढे घसरगुंडीसारख्या जागेतून गेल्यावर, तो पहाड खाली उतरून पुन्हा दुसऱ्या पहाडावर चढण्याची एक जिकिरीची चढण चढून साधारण दहा हजार पायऱ्या चढून गुरुदत्तांचे स्थान आले.
तेथे बाबा दर्शन घेऊन परतले आणि वेगळ्या प्रकारची चमक जाणवली. त्यांचा हा अनुभव ऐकून त्यांच्या घरातील मुलांनी गिरनार पर्वताची व त्या गोरक्षगूहेची यात्रा केली. ना तेथे त्यांना गुहेतील खोबण दिसली ना ते धुनीवाले बाबा...

.....असे आमचे बाबा, नवनाथांच्या विशेषतः जालंधर नाथांच्या, आर्शीवादाने अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधी औषधोपचाराने दूर करण्याने प्रत्येकाचा योगक्षेम साधण्यास सदैव तत्पर असतात.
... दर गुरूवारी त्यांच्याकडे सायंआरती मोठ्या आनंदाची असते. . शिवाय नवरात्रात देवीचे अधिष्ठान, अशा बाबांच्या काही आठवणी....
’अलख निरंजन!’


श्री अवधूत चिंतन दत्तात्रेय मंदिर, गिरनार धाम.





जुनागढ जवळ गिरनारचा नकाशा


देऊळगाव राजा गावातील गमती जमती...चितळेबाबा - वेदांचा अर्थ न कळे आम्हा !

चितळेबाबा वेदांचा अर्थ न कळे आम्हा !
दि. 24 डिसे. 2012 रोजी अनेक विषयांवर चर्चा करताना पु. चितळेबाबा वेद निर्मितीबद्दल विचारले तेंव्हा त्यांच्याबद्दल बाबा आपला अनुभव सांगताना म्हणाले, "एकदा मी एके दिवशी गुरू जालंघर महाराजांना अतिशय नम्रपणे विचारले, हे गुरूचारी वेद जे अति श्रेष्ठ आहेत व ते व्यासांमुळे जगाला ज्ञात झाले आहेत. त्यांचे वान करायची इच्छा झाली आहे तरी मला आज्ञा द्या आधी त्यांनी काही सुचवले नाही म्हणून, पण नंतर पुन्हा विनंती केली तेंव्हा दृष्टांच देऊन ते म्हणाले, वाचूनिया वेद तुला होईल खेद । तयातील भेद तु न जाणे।।'  यावर मी पुष्कळ दिवस विचार करत होतो. नंतर मी तो विचार सोडला ते कळले ही नाही
देऊळगाव राजा गावातील गमती जमती...
बंधू श्री अशोक यांनी बाबांची आठवण लिहिताना म्हटले होते की एकदा वडिलांना अंथरुणातून उठून बसायला अशक्य झाले इतका अशक्तपणा आल्याने त्या तीव्र आजाराबद्दल आईने तात्याला तो सुटीवर आला तेंव्हा म्हटले, बघ त्यांना काय झालेय ते. पुढे त्यांनी म्हटले होते की तात्याने लगेच वडिलांचा आजार बरा केला. ते करताना वडील 2-3 फूट अधांतरी हवेत बराच वेळ होते. ते मी स्वतः पाहिले... नंतर अकस्मात बरे झाले याबद्दल त्यांनी म्हटलयं.
 ... ती गोष्ट आठवते का? असे मी बाबांना विचारले असता त्यावर चितळेबाबा म्हणाले, असेल बुवा. पण मग जेंव्हा हवेत वडील अधांतरी झाले त्याची घटना असे अशोकजींनी पुढे म्हटलेय असे विचारल्यावर बाबा पटकन म्हणाले, ते होय... हो,  आठवते की. अहो, ती तर भानामती झाली होती!  मंत्रून घालवल्यावर वडील नंतर बराच वेळ अधांतरी होते. व लगेच खडखडीत बरे झाले’.
गोविंदराव आफळे बुवांची फिरकी!
 आणखी एक मजेशीर घटनेची बाबांनी सांगितलेली एक आठवण...
ते म्हणाले, एकदा मी गावी सुट्टीत गेलो असताना असताना एकजण कोणी 'भूतनाथ' म्हणून आहेत त्यांना भेटायला लांबून आलोय म्हणत मला भेटायला आले. सोबत आमच्या गावातील बडे धेंड आबासाहेव बक्षी पण होते. मी बालाजी मंदिराच्या आसपास बिडीचे झुरके घेत होतो. त्या अवस्थेत मला पाहून ते ग्रहस्थ ओरडले, बिडी फेक आधी ती. मंदिराच्या पवित्र जागी हा काय अनाचार?’ म्हणून त्यांनी बाबांची कान उघाडणी करीत म्हटले.  
मला राग अनावर झाला. मी कोण आहे तुला माहीत आहे का? मी म्हणालो, ओ आणि कोण तुम्ही? तो देव सर्वत्र आहे. मग मी इथे बिडी प्यालो काय किंवा इतर ठिकाणी तर काय झाले वेशावरून दीड दमडीचा भिक्षुक तू दिसतोय, तुला काय करायचे आहे? आमच्या गावात दर्शनाला आलायस तर मग ते घे व जा... मघे पडत बक्षी म्हणाले, आफळे महाराज, अहो जाऊ द्या, त्याच्या नका नादी लागू. तो तसाच आहे!  आम्हाला गावात राहायचे आहे. आपण कशाला उगीच त्याची छेड काढता आहात 
आबासाहेब पुढे  म्हणाले, अहो आपण ज्याला भेटायला म्हणून इथे आला आहात ते हेच भूतनाथ होत! 'अरे बापरे', म्हणत आपला ताव सोडून आफळे बुवांनी बाबांना विनंती केली, महाराजा, एका नाथपंथीय औलियाना भेट असा मला स्वप्नात आदेश आला म्हणून मी खूप शोधाशोध करून आपला माग काढत इथवर आले आहे. आपली माझ्याकडून आगळीक झाली त्याबद्दल मला माफ करावे. दुसऱ्या दिवशी मग 'आहेर करू इच्छितो' म्हणत धोतर-नारळ घेऊन सकासकाळी, आहेत का धनू?’ म्हणत ते आत आले. त्यावेळीचा माझा अवतार वेगळाच होता. कारण माझे वडील तेंव्हा पॅरेलेसिसने आजारी होते. विकलांग झालेले. त्यांची विष्ठा काढावी लागत असे. तसे करताना त्यांनी मला पाहिले. हात धुवत धुवत मी आफळे महाराजांना सामोरा गेलो. मातापित्यांची सेवा करताना कसली आलीय लाज?... माझा अवतार पाहून आफळे बुवांचा रागरंग बदलला होता. नाथ महाराजांची आपल्यावर कृपा झाली आहे असे कळल्याने प्रत्यक्ष भेटील आलो होतो. वडीलकीच्या नात्याने बोललो त्याचा राग मानू नये...
*ते होते राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्यातनाम गोविंदराव आफळे बुवा... नंतर अनेकदा बाबा त्यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला.

 वरील घटनेचे एक साक्षीदार होते प्रतिष्ठित धुंडिराज महाराज कवीश्वर म्हणून. त्यांचीही एक मजा आता सांगतो. एकदा धुंडिराज कवीश्वरांना दृष्टांत झाला की त्यांना पुढचा मार्ग तो (धनू) दाखवेल. ते म्हणजे, सध्याच्या दत्त महाराजांचे वडील. धुंडिराजजी 104 वर्षे जगले. त्यांचे वडील वक्रतुंड महाराज. त्यांच्याबद्दल निजामाच्या राज्यात त्यांनी सुर्यास्त थांबवला अशी नोंद आहे. तर त्या धुंडीराज महाराजांची आधीची एक आठवण बाबांनी सांगितली. ते म्हणाले, धुंडिराज महाराज, एकदा रस्त्यात गाठ पडले व म्हणाले, 'मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी भेटाला तुझ्या घरी येऊ काय? का बरे, मी त्यांना म्हटले, आपण कशाला कष्टता, मीच आपल्या घरी येतो ना. तसा गेलो. ते मला म्हणाले, महाराज नमस्कार, आणखी किती आयुष्य मला आहे?  आज प्रश्न विचारायच्या वेळी आम्ही 103 वर्षांचे झालो. 4 मुले 80 च्या वर गेली. आम्हा अजून किती राहिलेत?  यावर मी  एकदम म्हणालो, 'वासनांची तृप्ती नाही म्हणून अडकला आहात.' माझ्या न कळत इतक्या वृद्ध व्यक्तीला मी का असे म्हटले माहीत नाही. पण तरीही तसे उत्तर दिले खरे. मी पुढे म्हणालो, उत्तरायण लागले की 17 दिवसांनी म्हणजे 7 जानेला अंतिम वेळ असेल. ते नेमके त्याच दिवशी निवर्तले.

चितळेबाबा सांगतात आपल्या बहीण सुमनची पिशाच्च बाधा कशी दूर केली



2. बहीण सुमनची पिशाच्च बाधा कशी दूर केली?

माझे बालपण अतिशय गरीबीत गेलं. लहानपणी मलेरिया तर व्हायचा. पण पैसे तर नसायचे. म्हणून कडुनिंबाचा पाला उकळून ते औषध म्हणून घ्यायचं आणि त्याने आमचा मलेरिया बरा व्हायचा. हळुहळू शाळेत जायला लागलो आणि पाहता-पाहता मी नववीमध्ये गेलो. परत एक एक कुऱ्हाड कोसाळायला लागली. माझ्या नंतरची बहिणाला एकाएकी पिशाच्च बाधा झाली. खूप डॉक्टर केले. मांत्रिक-तांत्रिक आले करून गेले. पन्नास रूपये घेऊन गेले. त्यावेळेस पन्नास रूपये म्हणजे खूप असायचे. हा काळ होता 1954 सालचा. वैद्य आले, तांत्रिक आले पन्नास रूपये, पंचवीस रूपये, लिंबं – कापड काय जे त्यांना लुटता येईल ते लुटून गेले. परंतु, बहिणाला काहीएक आराम पडला नाही. पुढे असं कळलं की तिला कोणीतरी करणी केलेली आहे. म्हणून एक चांगला जुमड्याला जुमडा हे जालन्यापासून काहीतरी अठरा किलोमीटरवर गाव आहे. तिथे एक चांगला तांत्रिक होता. तो आला त्याचं नाव असरूबा. त्याने काहीतरी माणसाची दोन हाडं बांधून त्याला कुंकू वा शेंदुर काहीतरी लावून त्याच्यापुढे फुलं, अगरबत्ती लावून तो बहिणीची ट्रिटमेंट करत होता. मी लहान होतो त्यावेळी. बहिणीचे केस काळेभोर खूप लांब होते. गोरीपान होती ती. दुखण्याने जेवायला बसल्याबरोबर तिला उलट्या व्हायल्या लागायच्या आणि मग ती एक चमचाचमचाभर अन्न खाऊ लागल्याने ती फार अशक्त झाली होती. तांत्रिकाने तिचे केस धरले आणि ते जोरजोरात ओडले. एक लहानसा चाकू घेऊन तीच्या पाठीला लावला. "विचारलं तु कोण आहेस? बोल, बोल लवकर!" बहिण रडू लागली. माझ्याकडे बघून दुःखी अंतःकरणाने म्हणाली, अरे धनु बघ हा माझ्या पाठीला चाकू खोपतोय! हा केस ओतोय! खूप दुखतयं रे. मी त्या तांत्रिकाला म्हणालो, असरूबा अहो तिचे केस सोडा. तो चाकू तिला का टोचताय.
अरे म्हणे भाऊ तिला काय करणार नाही. ते पिशाच्च आहे. ते असच ढोंग करत असतं. ही करणी आहे हीला काढायलाच पाहिजे.
अहो तिला काढायला पाहिजे ते खरं आहे पण तुम्ही तिचे चाकू टोचताय, तिचे केस ओढताय तिला किती वेदना होत असतील. तुमचे केस ओढून पहा तुम्हाला कळेल ते. पण त्याने काही माझं ऎकलं नाही. तेवढ्यात मला राग आला. घरामध्ये तमाशा पाहण्यासाठी जवळजवळ पूर्ण घर भरलेलं होतं. त्यांना काय घरामध्य तमाशा चाललेला फुकट बघायला मिळतोय. आम्ही आपलं दुःखी अंतकरणाने समोर बसलेलो आहोत.
मी असरूबाला म्हणालो, आता माझ्याच्याने सहन होत नाही. हे तुमचं काय माणसाचं मुंडकं, हाडं वगैरे काय लावलय ते उचलून चालायला लागा. असरूबाला राग आला. असं काही नाही आहे. मी सांगतो ते ऎक. हा जो तु माणसाचं मुंडकं म्हणतो तो वेताळ आहे वेताळ आणि वेताळ हा पिशाच्च्यांचा राजा असतो. मी त्याला जागं केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तु अपशब्द बोलू नकोस.
मी म्हटलं, हे बघ अपशब्द वगैरे गेले उडत. हे तु उचल मडं, नाहीतर मी त्याला पायाने उडवून टाकेन. त्याला राग आला. मला तु फक्त त्याला स्पर्श करून दाखव. तु स्पर्श करून दाखवलास तर तुला मानेन.
मी म्हटलं, स्पर्श करणार नाही त्याला लाथेनं उडवीन. आई-वडील मधे पडले. जमलेली लोकं मध्ये पडली. नको धनु असं काही करू नकोस. ते फार भयंकर असतं. तु अजुन लहान आहेस. मी म्हणालो, ते आधी बहिणीचे केस तरी सोड.
त्याने कसेतरी केस सोडले. बहिणीला आता हायसं वाटलं. नंतर मी त्या वेताळाकडे पाठ फिरवली. काय म्हणालास याला हात लावून दाखव मी त्याला हात लावला तर तु काय करशील? ‘मी तुझ्या चरणावरती लोळीन.
मी म्हटलं, मी हात लावत नाही. मी ताडकन त्याला उजवी लाथ मारली. कवटी उडली आणि तीनचार फुटावरून खाली पडली.
बाळा मी तुला सांगितलं होतं हात लावू नकोस. तु जास्तीत जास्त पंधरा मिनिटं जगशिल. त्यानंतर तुला आता रक्ताची उलटी होईल. तु खाली पडशिल. मी तुला वाचवू शकत नाही. तुझ्या बहिणीला वाचवू शकेन की नाही ते सांगू शकत नाही. पण तुला मी वाचवू शकणार नाही. कारण तु प्रत्यक्ष वेताळाला लाथ मारलेली आहेस.
मी म्हटलं, असं काही होत नाही. हे सगळे चाळे आहेत. मी बसून राहिलो. नंतर लोकांनी चहा वगैरे घेतला. पंधरा मिनिटं सोडून अर्धा तास झाला. मला काहीएक झालेलं नाही. माझं बी.पी. वाढला नव्हता की मला काहीएक झालेलं नव्हतं. फक्त रागानं थरथर कापत होतो. थोडावेळानं तो म्हणाला, असं आहे तर तुझ्या बहिणीच्या शरीरात जे पिशाच्च आणि जी करणी आहे ती काढून दाखव.
ते कसं काढायचं मला काही सुध्दा माहित नव्हतं. मंत्र नाही, तंत्र काही सुध्दा नाही. मी कसं काढणार. पण परत विचार केला. ठिक आहे आपण काढू. महादेवाचं नावं घेतलं. मारूतीचं नाव घेतलं. कुठल्यातरी आठवलं त्या देवतांचं नाव घेतलं. त्या पिशाच्चाला आव्हान केलं, चलं नीघ बाहेर. इथे क्षणभरसुध्दा थांबू नकोस आणि आश्चर्य वाटेल अजूनही गावातील कितीतरी लोक साक्ष आहेत या गोष्टीला. बहिण फक्त दहा मिनिटात पूर्णपणे बरी झाली.
असरूबांनी माझ्या चरणावरती डोकं ठेवलं. म्हणाला, बाबा तु कोण आम्हाला माहित नाही. पण एवढी प्रचंड शक्ती आम्ही कुठेसुध्दा बघितली नाही.
मलासुध्दा एक अहंकार झाला. वाटलं व्वाआपणसुध्दा हे करू शकतो. पण नंतर थोड्यावेळानंतर कळलं. आपल्याला काहीच येत नाही. जाऊ द्या झालं गेलं वाटेला लागलं. पुढे कसातरी 1957 साली मॅट्रिक झालो. पोटासाटी अहमदाबादला गेलो. तिथे अहमाबादमध्ये पेपर टाकून कसातरी जीवन जगत होतो. एअरफोर्समध्ये चान्स मिळाला. एअरफोर्समध्ये ट्रेनिंगला गेलो. 1961 साली त्याच वेळेस परत बहिणाला हा त्रास सुरू झाला. ट्रेनिंग सेंटरहून परत येणं मला शक्य नव्हतं. कारण कोर्स पूर्ण करायचा होता. त्यातच ती 14 जानेवारी 1962 ला देवाघरी गेली. खूप दुःख झालं मला.

सब धर्मों का एक ही भंजन ।। नाम प्रभू का अलक्ष निरंजन।

अलख निरंजन अलख निरंजन ।

प्रार्थना

रचनाकार - पुज्य चितळेबाबा.

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन।

सब धर्मों का एक ही भंजन ।। नाम प्रभू का अलक्ष निरंजन। ।।ध्रु।।

सब शक्ति का एकही भंजन । नाम गुरू का अलख निरंजन।
चौ वेदों का एक ही भंजन । चौ मितियों का एक ही रंजन ।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।1।।

चली शाबरी शक्ति ऐसी । इस दुनिया की ऐसी वैसी
कोई नही किसी का इस दुनिया में । अकेले आना अकेले जाना ।
इस दुनियासे क्या लेना । य़े तो सारे संगी साथी ।जैसे शादी के बाराती।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।2।।

ब्रह्म रुप सब तेरी माया। मां के गर्भ में स्थान दिलाया ।
बहुत नरक यातना पाया ।सो हम् मंत्र का जाप किया।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।3।।

तब तो दिया मुझे झुटकारा । जैसा मिला मुझे झुटकारा ।
कोहम् मंत्र का मारा नारा । बहु कष्टों से पाई काया ।
बचपन खेल में बीत गया । तभी न मैंने तुझको पाया।
दिन ब दिन बढ़ गई काया । फिर प्रभूजी चढे जवानी । जैसे चाहे कर मनमानी।
षङ्रिपु की शक्ति ऐसी । भक्ति की हो गई ऐसी वैसी।
किस कारण मैं ने जन्म लिया । क्या तुझ से जो वादा किया ।।
सब कुछ मैं जो भूल गया। अहः तत्व ने जन्म लिया ।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।4।।

आयी जवानी आयी जवानी ।आयी जवानी गयी जवानी।
गई जवानी आया बुढापा। जगह जगह पर पाया धोखा।
झुटे रिश्ते झूटे नाते । ये तो सारे आते जाते । क्षण में सारे बदलते जाते।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।5।।

चार वेद है । कई मंत्र है। कई साधु है । कई संत है।
कई धर्म है। कई पंथ है। किस रस्ते से कैसे जाऊं ।
प्रभुजी तुझको कैसे पाऊं। गुरूजी तुझको कैसै पाऊं।
मैं मुढ़ मति हूं। मैं अज्ञानी। जैसे चाहे कर मनमानी।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।6।।

कई नाम तू धारण करता । कई धर्मों में आता जाता।
सब दुनियासे तेरा नाता।
कभी बनता नर कभी बनता नारी। माया तेरी ये है सारी ।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।7।।

किस नाम से तुझे पुकारू ।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन।

कहत गुरू -
अलक्ष निरंजन मंत्र जो गावे। प्रभू उसीकी साथ निभावे।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।8।।

अनाहत की ऐसी शक्ती। चरण में तेरे मेरी भक्ती।
षड़चक्रों को जागृत करना। तेरे चरण का मार्ग दिखाना।।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।9।।

भवसागर से मुझे क्या लेना। चाहे दे तू पार कर देना।
आगे कहीं में जहा भी जाऊं । जिस योनी में जहां भी जाऊं।
सब कुछ मैं जो भूल गया। अहः तत्व ने जन्म लिया ।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।10।।

जहां कहीं मैं जन्म ही पाउं। उसकी मुझको नहीं है चिंता।
एकही वर जो मुझको देना । इस दिन को भूल न जाना।।
हरदम आपके चरण रखना 

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन।

सब शक्ति का एकही भंजन ।। नाम प्रभू का अलक्ष निरंजन । ।।11।।

या प्रार्थनेची निर्मिती कशी व कुठे झाली
सांगतायत बाबा शीघ्र कवन करून...
ते शीघ्र कवी चितळेबाबा या शीर्षकात वाचा...

“शीघ्र कवी पुज्य चितळेबाबा”

शीघ्र कवी पुज्य चितळेबाबा

अलख निरंजन अलख निरंजन ।
नाम प्रभू का अलख निरंजन। सब का  धर्मों का एकही भंजन ।।
अलख निरंजन अलख निरंजन।

वरील प्रार्थनेच्या काव्य निर्मितीची रंजक माहिती नुकतीच बाबांनी सांगितली. ती ही एक शीघ्र काव्य करून! तेच आपल्याला त्यांच्या आवाजात  इथे सादर करत आहे. (इथे वर क्लिक करावे. मग बाबा प्रार्थना नावाचा पट्टा उलगडेल.त्यावर शेंदरीगोलातील बटन दाबावे. मग काव्य लोड होण्यास सुरवात होईल. त्यानंतर पुन्हा शेंदरी गोलात बटन दाबावे.)
पुज्य बाबा आग्रा येथे पोस्टींगला असताना साधकांचा उपद्रव वाढला. त्या भागातील प्रथेप्रमाणे लोक कोणी त्यांचे पाय चेपून किंवा ढोलकीवर भजन मंडळी जमवून त्यांचे मनरंजन व शारीरिक सेवा करू लागले. 
काही काळाने बाबा वैतागले. या लोकांना घरबसल्या काही म्हणायला दिले तर ते इकडे यायचे नाही असा वाटून गुरूंच्या आशीर्वादाने त्यांनीवरील काव्य रुपी प्रार्थना काही मिनिटात बनवली आणि अल्प काळात ती अनेकांच्या मुखी रुळली. आपलीशी झाली.
हे सर्व कथन मजेत करत असताना पुज्य बाबांनी या घटनेला बोलता बोलता ओवीरुपात बांधून आपल्या शीघ्र काव्यनिर्मितीची चुणून दाखवली.

आणि बाबांना जालंधरनाथांचे दर्शन 58 वर्षांनी झाले...

आणि बाबांना जालंधरनाथांचे दर्शन 58 वर्षांनी झाले...!

मे 2016 महिन्यातील घटना आहे...